वाचक लिहितात   

आनंदोत्सव समर्पक नाही
 
पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भारताच्या तिन्ही दलांनी एकत्रितपणे तोंड देऊन निर्दयी पाकिस्तानी समर्थक दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून परतावून लावले. अतिरेक्यांच्या हल्ल्यांना सामोरे जाताना देशाच्या सैनिकांनी धाडस, त्याग करताना देहाचे समर्पण केले. देशाच्या सीमेवर लढणार्‍या काही जवानांना प्राणत्याग करावा लागला. देशाच्या निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले. अशा परिस्थितीत वीरमरण प्राप्त झालेल्या भारतीय नागरिकांच्या आणि आपल्या जवानांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत आणि त्यांच्यासाठी दीर्घकालीन कल्याणकारी योजना जाहीर करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज व जबाबदारी देशाच्या प्रमुख प्रशासकांची आहे. तसे पाहिल्यास भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली युद्धपरिस्थिती पूर्णतः निवळली नसून काहीशी थंडावली आहे. पाकिस्तानकडून अजूनही लहान-मोठे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. दहशतवादी हल्लेखोरांमधील प्रमुख म्हटले जाणारे हल्लेखोर अजूनही फरारी आहेत, ते संधी मिळताच येत्या काळात भारतीय हद्दीत पुन्हा हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यावेळी उद्भवू शकणार्‍या परिस्थितीत सीमा प्रदेशात राहणार्‍या नागरिकांनी कसे सजग राहावे, हल्ल्यांना कसे सामोरे जावे याविषयीची संवेदनशील माहिती देत त्यांच्या मानसिकतेला बळ देण्याची गरज आहे. देशाच्या जवानांनी शौर्य पत्करून बलिदान दिले ते निश्चितच अभिनंदनीय आहे; परंतु त्या पराक्रमाचा राजकीय आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच्या बातम्या, दृश्ये पहावयास मिळत आहेत, ती समर्पक नाहीत.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
भरपाई द्यावी
 
अवकाळी पाऊस, वादळ-वारा यामुळे विदर्भात व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. वीज पडून माणसे व जनावरे दगावली आहेत, तर वादळ, वारा व गारांचा पाऊस यामुळे पिकांची हानी, घरादाराची पडझड, झाडे उन्मळून पडत आहेत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शासनाने आपल्या आपत्ती निधीतून संकट ओढवलेल्या परिवारांना तात्काळ मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा आहे. नुकसानीचे पंचनामेही तात्काळ करावे व तूटपुंजी मदत करण्याऐवजी भरघोस मदत करून या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचे बळ त्या परिवाराला द्यावे ही विनंती.
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
 
विज्ञाननिष्ठा जोपासावी
 
जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या अनुषंगाने ’नारळीकर व्यक्ती नव्हे संस्था...’ तसेच ’प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपले’ हे अनुक्रमे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि वरूण भालेराव यांचे संपादकीय लेख (दैनिक, केसरी दि.२१ मे) वाचले. ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान प्रसारासाठी साहित्य लेखन करत असल्याचे प्रतिपादन करण्याबरोबरच ’वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा; विज्ञान प्रसाराला बळ हवे’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यातून त्यांची विज्ञानाप्रति निष्ठा आणि विज्ञान प्रसारातून समाजहिताची तळमळ दिसून येते. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या अविष्कारामुळे घडलेली औद्योगिक क्रांती आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अनुभूतीतून आपल्याकडील सर्वसामान्यांच्या घराघरांत माणसांची कामे सुलभ करणारी वैज्ञानिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे आली; पण वैज्ञानिक दृष्टिकोन काही लोकांमध्ये रूजला नाही. म्हणूनच विज्ञान पाठ्यपुस्तकांच्या बाहेर येऊन जीवनाभिमुख झाल्याखेरीज त्याला ’लोकविज्ञाना’चे अधिष्ठान प्राप्त होणार नाही’ अशी भूमिका नारळीकर यांनी मांडली. समाजाने छद्मविज्ञानाला सोडचिठ्ठी देऊन विज्ञानवादाची कास धरावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
सिंहांची संख्या वाढतेय
 
बिग कॅट अर्थात महामार्जार प्रजातीच्या प्राणीकुळातील सर्वात बलवान, नितांत सुंदर व देखणा आणि जंगलचा राजा म्हणून मिरवणार्‍या सिंहाच्या बाबतीत एक सुखद बातमी आली आहे. भारतातील गुजरात राज्यातील सासण गीर वन्यजीव अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या वाढत आहे. या बातमीने वन्यजीवप्रेमींचे मन आनंदाने बहरून गेले आहे. बुद्ध पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्रप्रकाशात ’पूनम अवलोकन’ नावाच्या पारंपरिक पद्धतीने अलीकडेच सिंहांचे निरीक्षण आणि गणना करण्यात आली. त्यानुसार सिंहांच्या २०२० सालच्या ६७४ च्या संख्येत एकूण २१७ सिंहांची वाढ होऊन सिंहांची संख्या ८९१ वर पोहोचली आहे. शंभर वर्षांपूर्वी जगभरात सुमारे दोन लाख सिंह होते. सिंहांची प्रचंड शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे सध्या ती संख्या वीस हजारांवर आली आहे. जगात सिंहाची संख्या अनेक कारणांनी झपाट्याने कमी होत असताना आणि धोक्यात असलेल्या प्रजातीमध्ये सिंहाचा समावेश झालेला असताना भारतातील सिंहांच्या संवर्धनाच्या योजनांमुळे भारतात सिंहांची संख्या वाढते ही खरेच आनंदाची बाब आहे.
 
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रास्तच
 
भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही की जिथे आम्ही जगातून आलेल्या परदेशी नागरिकांना रहायला जागा देवू अशी कठोर टिप्पणी नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केली असल्याचे वृत्त आहे ते निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागेल , सद्या देश १४० कोटी जनतेसह संघर्ष करीत आहे , असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
 
श्रीलंकेतील एका नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात आश्रयासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या नागरिकाला २०१५ मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमशी जोडल्याच्या आरोपावरून अटक झाली होती. त्याला या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्याला श्रीलंकेत मारले जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याला भारतातच राहायचे आहे. त्यासाठी त्याने अर्ज दाखल केला आहे. शरणार्थींना राहण्यास परवानगी देण्यासाठी भारत देश काय धर्मशाळा आहे? असा सवालही न्यायालयाने केला आहे. जगभरातील निर्वासितांना भारतात स्थान देणे शक्य आहे का, आपण १४० कोटी लोक येथे अनेक अडचणींना तोंड देतो. भारत एखादी धर्मशाळा नाही, असे न्यायालयाने म्हटले. एवढेच नव्हे तर त्याला थेट दुसर्‍या देशात आश्रय घेण्यास सांगितले आहे. अर्जदाराच्या अटकेबाबतच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही देशांतील नागरिक भारतात घुसखोरी करतात. अशा स्थितीत न्यायालयाच्या या टिप्पणीला फार महत्त्व आले आहे!
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव

Related Articles